27.3 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

भाजप आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनतोय; नाशिकच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान

भाजप आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनतोय; नाशिकच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

नाशिक : राज्यात महिलांची सुरक्षितता हा गंभीर चिंतेचा विषय बनला असून, सत्ताधाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे ठाम मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

भाषणादरम्यान ॲड. आंबेडकर यांनी महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. बदलापूरसारख्या घटनांमुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असून, राजकीय पातळीवरही जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

“भाजप आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनत चालला आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राजकीय सत्तेचा वापर जनतेच्या सुरक्षेसाठी व्हायला हवा; गुन्हेगारांचे संरक्षण करण्यासाठी नव्हे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भात बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, नैतिक मूल्ये, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या लोकशाहीच्या मूलभूत आधारस्तंभ आहेत. विरोधी पक्ष आणि प्रादेशिक राजकीय शक्ती सक्षम राहिल्या, तरच लोकशाही संतुलित राहू शकते. अन्यथा सामान्य नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित होण्याचा धोका निर्माण होतो, असा इशाराही त्यांनी दिला.

निवडणूक प्रक्रियेबाबत मत व्यक्त करताना त्यांनी मतदारांना प्रलोभनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. पैसे, साड्या, दारू किंवा अन्य आमिषांना बळी न पडता लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी जनतेवरही आहे, असे त्यांनी सांगितले. “तुमचे मतदान केवळ उमेदवार निवडत नाही, तर येणाऱ्या पिढीचे भवितव्य ठरवते,” असे त्यांनी मतदारांना बजावले.

नाशिक शहराच्या विकासासाठी समताधिष्ठित, सर्वसमावेशक आणि न्याय्य धोरणांची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन केले. महिलांची सुरक्षा, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि लोकशाही मूल्ये यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नाशिक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!