धनगर आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना–अंबडमध्ये संचारबंदी, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
जालना | प्रतिनिधी
धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जालना व अंबड शहरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने BNSS कलम 163 अंतर्गत प्रतिबंधक आदेश लागू केले असून, या कालावधीत पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव, मोर्चे, निदर्शने, शस्त्रे अथवा ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिस्थिती संवेदनशील असल्याने शहरातील प्रमुख चौक, शासकीय कार्यालये, महत्त्वाच्या मार्गांवर पोलीस व दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. संभाव्य मोर्चे, आंदोलनकर्त्यांची मुंबईकडे जाण्याची शक्यता आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केली आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा, दुकाने, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
परिस्थितीवर प्रशासनाची बारकाईने नजर असून, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.




