अकोल्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट)–भाजप जवळीक; वंचित बहुजन आघाडीचा जोरदार पलटवार
अकोला | प्रतिनिधी
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अकोला महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा जोर धरत आहे. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीतील अंतर्विरोध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांची वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा दिला गेल्याने अकोल्यात संतापाची लाट उसळली आहे. “विचारांचा गजर करणारा पक्ष प्रत्यक्षात सत्तेसाठी तडजोड करतो,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. फुले–शाहू–आंबेडकरांची नावे केवळ राजकीय सोयीसाठी वापरली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील पुरोगामी विचारवंत, पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना थेट जाब विचारला आहे. निवडणूक काळात वंचितच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांनी आता राष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर मौन का पाळले आहे, असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावरून जाहीरपणे प्रतिक्रिया मागत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, संजय आवटे, अभिनेता किरण माने, दीपक पवार आणि संग्राम पाटील यांची नावे घेतली आहेत.
“जे नेहमी भाजपविरोधात बोलतात आणि संविधान वाचवण्याच्या घोषणा देतात, ते आता राष्ट्रवादीच्या भाजपसमर्थनावर गप्प का?” असा थेट सवाल वंचितने केला आहे.
अकोल्यातील या घडामोडीमुळे महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वंचितने या संपूर्ण प्रकाराला ‘सत्तेसाठीची सोयीची राजकारणं’ अशी उपरोधिक टीका करत महाआघाडीतील दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे.




