औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) | प्रतिनिधी
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून काँग्रेसला धक्का, तर वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
प्रभाग ११ मध्ये मजबूत जनसंपर्क आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या इब्राहिम पटेल यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक लढवण्याऐवजी थेट वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पाठिंब्यामुळे आयुब खान यांना इब्राहिम पटेल यांच्या समर्थकांचा थेट पाठिंबा मिळाला असून, पटेल गट आता वंचितच्या प्रचारात सक्रिय झाला आहे. परिणामी प्रभाग ११ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांसाठी ही लढत अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, याआधीही महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ माघार घेतल्याचे चित्र दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक न लढवता वंचितचे उमेदवार सतीश दामू पटेकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता.
सलग दुसऱ्यांदा प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने माघार घेतल्याने, आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.




