मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून टीका केली असून कोर्टाच्या हस्तक्षेपावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“नागपूर खंडपीठाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा”
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले —
“निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करत नाही. मग नागपूर खंडपीठाला असा निर्णय देण्याचा अधिकारच नाही. हा निर्णय संविधानविरोधी असून निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारा आहे.”
त्यांनी हेही स्पष्ट केले की —
“चिन्हवाटपाचे प्रकरण जिल्हा स्तरावर ऐकले जाते. हाईकोर्टाला त्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगालाही स्वतःचा कार्यक्रम मनमानीने पुढे ढकलण्याचा अधिकार नाही.”
महत्त्वाचा सवाल
आंबेडकरांनी विचारले —
“आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १० डिसेंबरपर्यंत नव्या नगरसेवकांचे गॅझेट प्रसिद्ध व्हायला पाहिजे. आता निकाल पुढे ढकलल्यामुळे दोन वेगळ्या निवडणूक प्रक्रिया कशा एकत्र जाऊ शकतात?”
राजकीय पक्षांना थेट आवाहन
प्रकाश आंबेडकरांनी सर्व राजकीय पक्षांना थेट हाक दिली —
“निवडणुकांमध्ये कोर्टाचा वाढता हस्तक्षेप हा लोकशाहीला अपायकारक आहे. जर गरज पडली तर जेलमध्ये जाण्यासाठीही घाबरू नका.
21 तारखेच्या मतमोजणीला आता काही अर्थ नाही. कोर्टाने स्थगित केलेली मतमोजणी त्वरित सुरू करावी.”
निवडणूक आयोगालाही सुनावणीची मागणी
आंबेडकर म्हणाले —
“निवडणूक आयोगाने कोर्टात जाऊन स्पष्ट भूमिका मांडावी. सरन्यायाधीशांनी हे प्रकरण ताब्यात घेऊन न्यायनिवाडा करावा, अन्यथा लोकशाही प्रक्रियेत गोंधळ वाढेल.



