नागपूर प्रतिनिधी :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पूर्ण खेळखंडोबा झाल्याची तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केली आहे. नागपूर खंडपीठाने आज दिलेल्या आदेशानुसार, उद्याची नियोजित मतमोजणी रद्द करण्यात येऊन २१ डिसेंबर ही नवी तारीख निश्चित करण्यात आली. या निर्णयानंतर राजकीय तापमान अचानक चढले असून, निवडणूक प्रक्रियेवरील जनविश्वासाला मोठा धक्का बसला आहे.
वड्डेटीवार यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला थेट जबाबदार धरत, “राज्यातील निवडणुका हा पोरखेळ झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावून ओबीसी २७ टक्के आरक्षणाचे राजकारण करण्याचा सरकारचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे,” असा आरोप केला.
सरकार-आयोगवर गंभीर आरोप
वड्डेटीवार म्हणाले की,
- “निवडणूक आयोग आता सरकारच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले बनले आहे.”
- “राज्यात इतक्या निवडणुका झाल्या, पण मतमोजणी अचानक रद्द करण्याचे असे उदाहरण कधीच घडले नव्हते.”
- “निवडणुकांचा निकाल आपल्या बाजूने येणार नाही असे दिसताच, मतमोजणी लांबणीवर टाकण्याचा खेळ सुरू आहे.”
त्यांनी असा गंभीर सवालही उपस्थित केला की, “हा मत चोरीचा प्रकार तर नाही ना?”
फडणवीस सरकारवर थेट निशाणा
विजय वड्डेटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट प्रहार करत,
“यासाठी संपूर्ण फडणवीस सरकार जबाबदार आहे. मतमोजणीत अडथळा आणणे म्हणजे निकालावर परिणाम घडवण्याचा प्रयत्न. लोकशाहीचा गळाच घोटला जात आहे,” असा आरोप केला.
त्यांच्या मते, आरक्षणाचा बहाणा करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया डळमळीत केली जात आहे आणि याचा परिणाम हजारो उमेदवार व लाखो मतदारांवर होतो आहे.
मतदारांमध्ये संभ्रम, उमेदवारांत नाराजी
मतमोजणीचा कार्यक्रम रद्द झाल्याने अनेक उमेदवार संतप्त आहेत.
आधीच प्रचंड खर्च, मनुष्यबळ आणि राजकीय दडपण झेललेल्या उमेदवारांसाठी हा निर्णय आणखी अनिश्चितता निर्माण करणारा ठरला आहे.
निवडणुकीत सहभागी झालेल्या मतदारांमध्येही नाराजी व्यक्त होत असून, “मतदान झाले तरी निकाल कधी येणार?” अशी स्थिती निर्माण झाली आहे.



